१.२.२००९
आज आमच्या समाजाचा (महादेव कोळी) महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ आणि मेळावा होता..अगदी पुणे, नाशिक, जव्हार पासून सगळे आले होते..या कार्यक्रमाची मी अध्यक्ष होते..मला काही भाषण वगैरे काही करता येत नाही पण प्रसंगानुरूप काही तरी बोलणे भाग होते...नेट वरून सावित्रीबाईंची थोडी माहिती मिळाली आणि साधारण पाच मिनिटांमध्ये संपेल असे भाषण लिहिले...
विद्येची देवता सरस्वती,
सर्व भारतीय स्त्रियांसाठी,
शिक्षणाची गंगा निर्माण करणा-या,
सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र स्मृतीस
विनम्र अभिवादन..
इथे मंचावर उपस्थित मान्यवर आणि या मेळाव्याला आवर्जुन उपस्थित राहिलेल्या बंधु-भगिनींना माझा सप्रेम नमस्कार..
आज अशा प्रकारे मंचावरून आपल्याशी संवाद साधता येणे हा माझ्या आयुष्यातील फार मोठा क्षण आहे..
भगिनींनो आपण हळदी-कुंकू समारंभ, महिला मेळावा यामध्ये सावित्रीबाई फुलेंचा आवर्जुन उल्लेख करतो, त्यांच्या तसबीरीची पुजा करतो..कोण होत्या या सावित्रीबाई फुले ?
आजच्या शिक्षण घेऊन साक्षर झालेल्या पीढीला त्यांच्याविषयी नक्कीच माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की सावित्रीबाई यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात १८३५ मध्ये झाला..त्या त्या काळच्या रुढीप्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला..महात्मा फुल्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखले होते. त्यांनी घरीच सावित्रीबाईना अक्षरांची ओळख करून देऊन त्यांना शिक्षण दिले.
१८४८ मध्ये पुण्यामध्ये मुलींची पाहिली शाळा सुरु झाली, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्याही १०० वर्षे आधी. त्या काळात मुलींनी, बायकांनी मुळात शिक्षण घ्यायचेच कशाला, त्यांना शिक्षणाची गरजच काय..त्यांनी फ़क्त चुल आणि मुल सांभाळावे असेच प्रश्न समाजाला पडत होते.
सुरुवातीला या शाळेत फ़क्त चार-पाच मुली येत, त्यांना शिकवण्यासाठी सावित्रीबाई जावू लागल्या की त्यांना गावक-यांकडून दगड मारले जात, त्यांच्यावर शेण-माती टाकली जाई..पण याही परिस्थीतीत महात्मा फुले यांच्या प्रेरणेने त्या अत्यंत शांतपणे आणि निग्रहाने आपले काम करीत राहिल्या..पुढे हळुहळु मुलींची संख्या वाढत गेली आणि स्त्री शिक्षणाचा दिवा अखंड तेवत राहिला..
भगिनींनो तुम्ही कधी विचार केलाय की सावित्रीबाईनी एवढा विरोध सहन करूनही मुलींना शिकवावसं का वाटलं असेल? तर मुलींच्या उत्कर्षासाठी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी..
आज आपल्या समाजात आताची तरुण पिढी ही साक्षर आहे..आज आपण शिक्षणाचे महत्व ओळखले आहे, पण मनात रुखरुख कायमची राहून गेली आहे ती ही की आपल्या मागच्या पिढीतल्या आपल्या आई, मावशी, काकू यांना शिक्षण घेता आले नाही किंवा परिस्थिती मुळे, लवकर लग्न होण्याच्या आपल्यातील जुन्या रुढीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले..त्या आज बोलून दाखवत नसल्या तरी त्यांच्या मनात कुठेतरी हा सल असेलच क आपणही शिक्षण घ्यायला हवे होते..
या शिक्षणाची एक गंमत असते बरं का भगिनींनो, ते कुठल्याही वयात घेता येतं..फ़क्त मनात इच्छा असली की झालं. आज ज्यांना लिहिता वाचता येत नाही, ज्यांना सही करता येत नाही, त्याऐवजी त्यांना अंगठा द्यावा लागतो अशा भागिनिनी आज एक संकल्प करायचाय की मी आजपासून सावित्रीबाईना स्मरून लिहायला, वाचायला सुरुवात करीन.
शिकायला सुरुवात करताना आधी तुमचं मनच तुम्हाला नाही म्हणेल..मनात म्हणाल काय करायचय आता या वयात शिकून..घरचे दारचे आपल्याला हसतील की काय? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडतील पण या सर्वांवर मात करून मला शिकायचय ते स्वतःसाठी असं तुम्हाला तुमच्या मनाला सांगावं लागेल. घरात तुमची मुलं असतील, पती असेल त्यांची मदत घ्या आणि ज्ञानाच्या प्रकाशाला तुमच्या मनात येऊ द्या. येथे उपस्थित असलेल्या समस्त मुलं-मुली, पुरुषानाही आवाहन करीत आहे की तुम्ही सगळ्यानी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन द्या. आपल्या घराघरातुन प्रौढ़ शिक्षण होऊ द्या.
आजपासून बरोबर एक वर्षाने आपण पुन्हा अशा मेळाव्यात भेटणार आहोत. तेव्हा या वर्षभरात अक्षरओळख करून घेणा-या महिला ज्या वाचू शकतील, लिहू शकतील, आपली सही करू शकतील अशा महिलांचा याच मंचावर जाहीर सत्कार केला जावा अशी मी आपल्या मंडळाला विनंती करत आहे. आपली कुठली अड्चण असेल, मदत हवी असेल तर आपले मंडळ मदतीसाठी नेहमीच तत्पर आहे. आपण विनासंकोच संपर्क साधू शकता.
आपण सगळ्याजणी सावित्रीबाईंच्या लेकी आहोत, तेव्हा आपण सर्वांनी आज येथे संकल्प करुया की मी शिक्षण घेत राहीन आणि माझ्या भगिनीनाही या ज्ञानमार्गावर घेउन चालत राहीन.
जाता जाता शिक्षण घेऊ इच्छिणा-या सर्व जागृत मनांना मी खूप खूप शुभेच्छा देत आहे.
आपला खूप वेळ घेतला.आपण सर्वांनी हे शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी आपली आभारी आहे. आपले मनापासून ध्यन्यवाद.